मी फक्त नऊ वर्षांचा होतो, त्यावेळी आजोबांनी मला सांगितलं, की आमच्या नाशिक शहरात सहा वर्षांपूर्वी चेंगराचेंगरीमुळे ३९ मृत्यू झाले होते. हा भयंकर प्रसंग त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला होता. ही घटना २००३ साली नाशिकच्या कुंभमेळ्यात घडली. कुंभमेळा हा जगातल्या सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक. १५ लाख लोक सामावू शकणाऱ्या आमच्या शहरात दर बारा वर्षांनी सुमारे ३० दशलक्ष हिंदू भाविक उतरतात आणि ४५ दिवस मुक्काम करतात. गोदावरीत स्नान करून आपली सर्व पापं धुवून टाकणं हा त्यांचा उद्देश असतो. ही प्रचंड मोठी गर्दी संथ गतीने पुढे सरकत असते, त्यामुळे चेंगराचेंगरी होणं सहज शक्य असतं. नाशिकप्रमाणेच हा मेळा भारतात आणखी तीन ठिकाणी वेगवेगळ्या वेळी भरतो. २००१ ते २०१४ या काळात या घटनांमध्ये चेंगराचेंगरीमुळे २४०० च्या वर मृत्यू घडून आले आहेत. मला सर्वात जास्त दुःख या गोष्टीचं झालं, की दर कुंभमेळ्याच्या वेळी असे डझनावारी मृत्यू घडतात आणि समाज त्यांना अटळ म्हणून, शहराचं दुर्दैव मानून, केवळ पाहत राहतो. मला वाटलं, हे बदललं पाहिजे. आपण यावर उपाय शोधायचा प्रयत्न का करू नये? कारण मला हे चुकीचं वाटत होतं. लहानपणीच कोडिंग शिकल्यामुळे आणि अंगी उत्पादकवृत्ती असल्यामुळे मला एक भन्नाट कल्पना सुचली. (हशा) [उत्पादक मार्ग काढतातच.] माझी भन्नाट कल्पना होती, गर्दीच्या लोंढ्यावर नियंत्रण ठेवणारी एक यंत्रणा तयार करून ती २०१५ सालच्या कुंभमेळ्यात वापरायची. त्यामुळे चेंगराचेंगरी कमी होऊन, कमी लोक मृत्युमुखी पडतील. हे स्वप्न अशक्य कोटीतलं भासत होतं. एका १५ वर्षांच्या मुलासाठी तर हे फारच मोठं स्वप्न होतं. पण २०१५ मध्ये ते स्वप्न साकार झालं. चेंगराचेंगरीचं प्रमाण आणि तीव्रता कमी करण्यात आम्हांला यश आलं, इतकंच नव्हे, तर २०१५ हे नाशिकच्या कुंभमेळ्यातलं चेंगराचेंगरीशिवायचं पहिलंच वर्ष ठरलं. (टाळ्या) एकही मृत्यू न घडता हा मेळा पार पडण्याची ही इतिहासातली पहिलीच वेळ होती. आम्ही हे कसं घडवून आणलं? याची सुरुवात २०१४ मध्ये झाली. त्यावेळी एम आय टी मीडिया लॅब च्या नवनिर्माण कार्यशाळेत मी सहभागी झालो होतो. कुंभमेळ्याच्या विराट स्वरूपामुळे उभे राहणारे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने निर्माण झालेली कुंभथॉन कार्यशाळा. आमच्या लक्षात आलं, की चेंगराचेंगरीचा प्रश्न सोडवण्यासाठी तीन गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. लोकांची संख्या, ठिकाण, आणि गर्दीच्या चालण्याच्या गतीचा मिनिटागणिक दर. या तीन गोष्टींसाठी कोणतं तंत्रज्ञान वापरता येईल ते आम्ही शोधू लागलो. प्रत्येकाला रेडियो फ्रिक्वेन्सी टोकन देऊन त्यांचा माग ठेवता येईल का? पण ३० दशलक्ष टोकन्स वाटणं महागडं आणि अव्यवहारी ठरेल हे आमच्या लक्षात आलं. प्रतिमा-प्रक्रिया तंत्रज्ञान असणारे सीसीटीव्ही कॅमेरे वापरता येतील का? पुन्हा, तेही प्रचंड संख्येमुळे खर्चिक. तसंच त्यांची ने-आण करणं कठीण. शिवाय बरेचदा कुंभमेळ्याच्या दिवसांत पाऊस पडतो, त्यावेळी ते कुचकामी ठरतील. सेलफोन टॉवर्स चा डेटा वापरता येईल का? हे उत्तर अगदी अचूक वाटलं. पण गंमत अशी, की कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी लोक सेल फोन्स नेत नाहीत. आणि तो डेटा फारसा तपशीलवार नसल्याने आमच्या उपयोगी पडला नसता. तात्काळ आणि सहजपणे डेटा प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देणारं, स्वस्त, मजबूत, जलरोधक असं काहीतरी आम्हाला हवं होतं. म्हणून आम्ही अशियोटो तयार केलं. म्हणजे जपानी भाषेत "पाऊल". यात आहे ने-आण करायला सोपी अशी एक मॅट. त्या मॅटमध्ये प्रेशर सेन्सर्स असल्याने तिच्यावरून चालत जाणाऱ्यांची संख्या ती मोजते आणि तो डेटा पृथक्करणासाठी आम्ही निर्माण केलेल्या एका सॉफ्टवेअरला इंटरनेटद्वारे पाठवते. पावलं मोजण्यात होऊ शकणाऱ्या चुका टाळण्यासाठी मॅटच्या रचनेचा आधार घेतला गेला. मॅटची योग्य रुंदी १८ इंच ठरवण्यात आली. त्याआधी अनेक वेगळ्या आकारांच्या चाचण्या आम्ही घेतल्या होत्या आणि साधारण लोकांच्या चालीचं निरीक्षण केलं होतं. नाहीतर लोक, सेन्सर्सवर पावलं न टाकता ते ओलांडून गेले असते. तीन दिवसांत आम्ही पुठ्ठा आणि अॅल्युमिनियम फॉईल वापरून आमच्या कल्पनेतला नमुना तयार केला. (हशा) आणि खरोखरीच तो यशस्वी ठरला. अॅल्युमिनम कंपाॅझिट पॅनल्स व पिझोइलेक्ट्रिक प्लेट्सपासून आम्ही दुसरा नमुना तयार केला. या प्लेट्सवर दाब पडताच त्यातून छोटासा विद्युतप्रवाह निर्माण होतो. आम्ही रेस्टोरंटस, मॉल, देवळं अशा ३० निरनिराळ्या गर्दीच्या ठिकाणी याची चाचणी घेऊन लोकांची प्रतिक्रिया अजमावली. शहरासमोरच्या प्रश्नावर स्थानिक मुलं काम करताना पाहून लोकांनी उत्साहाने मदत केली. माझं वय होतं १५ आणि माझ्याबरोबरची मुलं विशीत होती. आम्ही रंगीत सेन्सर्स केले होते, तेव्हा लोक घाबरून विचारायचे, "याच्यावर पाय ठेवला तर शॉक लागेल का?" (हशा) किंवा जमिनीवर सेन्सर दिसत असेल तर त्याच्यावरुन उडी मारून जायचे. (हशा) जमिनीवर हे काय आहे, अशी लोकांना भीती वाटू नये म्हणून सेन्सरवर आच्छादन घालायचं आम्ही ठरवलं. अशा काही प्रयोगांनंतर आम्ही इंडस्ट्रीयल सेन्सर आणि आच्छादन म्हणून काळं निओप्रीन रबर वापरायचं ठरवलं. हे सेन्सर धोक्याच्या क्षेत्रात वापरले जातात. काळं रबर वापरण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यावर माती साचल्यावर ते जमिनीसारखंच दिसायचं. सेन्सरची जाडी १२ मिमी पेक्षा कमी ठेवण्याची खबरदारी आम्हांला घ्यावी लागली. नाहीतर लोक अडखळून पडले असते, आणि त्यामुळे चेंगराचेंगरी सुरु झाली असती. (हशा) तसं नक्कीच व्हायला नको होतं. (हशा) आम्ही १० मिमी जाडीचा सेन्सर तयार केला. आता डेटा तात्काळ सर्व्हरला पाठवला जातो. आणि एक हीटमॅप काढला जातो. जमिनीवर कार्यरत असणारे सर्व सेन्सर्स विचारात घेतले जातात. गर्दीचा वेग कमी झाला किंवा गर्दी एका ठराविक प्रमाणाबाहेर वाढली, की अधिकाऱ्यांना सूचना दिली जाते. २०१५ च्या कुंभमेळ्यात आम्ही अशा पाच मॅट्स बसवल्या आणि १८ तासांत पाच लाख लोकांची गणना केली. हा डेटा आम्ही अनेक नियंत्रण कक्षांना तात्काळ उपलब्ध करून दिला आणि गर्दीचा प्रवाह सुरक्षित ठेवला. या आणि अशाच काही इतर संशोधनांमुळे या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी रोखण्याला मदत झाली. अशियोटो साठी वापरला गेलेला कोड लवकरच सर्वांच्या वापरासाठी खुला करण्यात येणार आहे. हा कोड वापरून कोणी असेच इतर मोठे मेळावे सुरक्षित करू शकलं, तर मला फार आनंद होईल. कुंभमेळ्यातल्या या यशाने मला इतर ठिकाणची चेंगराचेंगरी थांबवण्यासाठी प्रेरणा दिली आहे. या प्रणालीची रचना अशी आहे, की ती कोणत्याही नियोजित मेळाव्यासाठी अनुरूप करून वापरता येईल. आता माझं पुढचं स्वप्न आहे, या प्रणालीत आणखी सुधारणा करून, जास्त अनुकूलन आणून गर्दीचा प्रवाह सुरक्षित करून मनुष्यहानी वाचवण्यासाठी ती जगात सर्वत्र वापरायची. कारण, प्रत्येक मानवी जीव हा मौल्यवान आहे. गाण्याच्या मैफिली, खेळांचे सामने, अलाहाबादचा महाकुंभमेळा, मक्केची हज यात्रा, करबालाची शिया यात्रा किंवा व्हॅटिकन सिटी, कुठेही. तुम्हांला काय वाटतं, असं करता येईल? प्रेक्षक: होय! धन्यवाद. (वाहवा) (टाळ्या)